
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा!
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी व धूलिवंदनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे सण साधेपणाने साजरे करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत, याची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत.
होळी, धुलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.