
१० वीच्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या साठी राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना राबविणार!
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना बार्टी च्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली.
धनंजय मुंडे ट्विट करत म्हणाले की “१०वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ११वी व १२वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख याप्रमाणे एकूण २ लाख रुपयांचे अनुदान देणार” अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच पुढे धनंजय मुंडे म्हणाले की “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना बार्टीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. योजनेमधील लाभार्थी संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही” अशी त्यांनी माहिती दिली आहे.
अनुसूचित जातीमधील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे शैक्षणिक क्षेत्रातील आलेख उंच असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा निश्चित फायदा होणार आहे.